शंका निरसन भाग १



“डॉक्टर मला थोड बर वाटतंय पण अजून जास्त पॉवर च किंवा strong औषध द्या म्हणजे लवकर बरे वाटेल.”

शंका निरसन भाग १

हे वाक्य बहुतांश होमिओपॅथनी ऐकल असेल. आणि बरेच वेळा त्याबद्दल रुग्णांना समजावलेही असेल. मीही त्यातलीच एक! आणि म्हणूनच माझ्या त्या सर्व रुग्णांसाठी हा लेख प्रपंच.

 

मुळात होमिओपॅथी मध्ये “जास्त strong औषध” ही अॅलोपॅथीच्या औषधांना लागू होणारी संकल्पना अस्तित्वात नाही. मग आता तुम्ही म्हणाल मग तुमच्या औषधांची पॉवर म्हणजे असते काय नेमके?  तर आपण सुरु करू औषध तयार करण्याच्या प्रक्रीये पासून.

 

मुद्दा १. Potentization (औषधे बनविण्याची शास्त्रीय प्रक्रिया)

 

होमिओपॅथीची औषधे ही potentisation या प्रक्रियेतून तयार केली जातात.

३००० हून अधिक औषधे होमिओपॅथीमध्ये जगभर वापरली जातात. वनस्पती पदार्थ, प्राणिज पदार्थ, खनिजे, प्राण्यांच्या ग्रंथींचे स्त्राव अश्या विविध स्त्रोतांपासून होमिओपॅथीची औषधे बनविली जातात. या स्त्रोत (crude medicine) पदार्थांचे potentisation केले जाते.

 

Potentisation ही एक शास्त्रीय प्रक्रिया आहे. साधारण सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, यामध्ये स्त्रोत पदार्थ (crude medicine) हा ‘औषधी गुणधर्म नसलेल्या पदार्था’ बरोबर, विशिष्ठ प्रमाणात विरल (Dilute) केला जातो. आणि या मिश्रणाला एका विशिष्ट पद्धतीनी जोरात हलविले जाते किंवा घासले जाते. त्यातून पहिली मात्रा (potency) तयार होते. मग तयार झालेले औषध परत विरल करून परत जोरात हलविले जाते किंवा घासले जाते. अश्या प्रकारे स्त्रोत पदार्थापासून औषधाच्या वेगवेगळ्या मात्रा (potencies) तयार करण्यात येतात.

या संपूर्ण प्रक्रीये मध्ये ज्या औषधाच्या मात्रा (potencies) तयार होतात त्यात तो स्त्रोत पदार्थ भौतिक स्वरूपात आढळला नाही तरी त्यातील औषधी गुणधर्म तसेच राहतात किंबहुना वाढलेले आढळतात.

मग पुढील पुढील मात्रा किंवा potencies या जास्त जास्त औषधी गुणधर्म असलेल्या, म्हणजेच जास्त strong होणार ना? तर तसे नाही. इथे येतो .....

 

मुद्दा २: proving of homoeopathic medicines (होमिओपॅथीची औषधे वैद्यकीय वापरा आधी सिद्ध करणे)

 

साधारणतः आधुनिक शास्त्रातील (pharmacology) मधील औषधे ही प्राण्यांवर सिद्ध करून मग आजारी माणसांवर सिद्ध करण्यात येतात. मात्र होमिओपॅथी मध्ये औषधे निरोगी माणसांवर सिद्ध केली जातात. ही औषधे जी लक्षणे निरोगी व्यक्तीमध्ये निर्माण करतात. तीच लक्षणे बरी करण्यास या औषधांचा वापर केला जातो.  

औषधे सिद्ध करताना शारीरिक तसेच मानसिक लक्षणांचाही सखोल अभ्यास केला जातो. ही औषधे विविध मात्रांमध्ये (potencies) सिद्ध केली जातात. आणि महत्वाचे म्हणजे वेगवेगळ्या मात्रा वेगवेगळी लक्षणे किंवा त्या लक्षणांचे विविध पैलू (sensations, Modalities, concomitants) समोर आणु शकतात.

याचा अर्थ असा कि एखाद्या औषधाची कमी मात्रा देऊन निर्माण होणारी लक्षणे आणि जास्त मात्रा देऊन निर्माण होणारी लक्षणे त्यांच्या विविध पैलू सकट एकसारखी असतीलच असे नाही.

एखादे लक्षण, उदाहरणार्थ पोटदुखी, जर ३० मात्रे मुळे निरोगी माणसात निर्माण होत असेल तर ते २०० मात्रा दिल्यावर अधिक तीव्र पोट दुखेल असे नाही.

मग या विविध मात्रा कश्यासाठी? तेच उदाहरण घेऊ पोटदुखी. कदचीत ३० मात्रे मुळे फक्त पोट दुखेल, २०० मात्रेमुळे पोट दुखेल आणि ते काश्यानी वाढते कमी होते हेपण जाणवेल, १००० मात्रेमुळे बारीक पोट दुखून चिडचिड, राग येणे असे काही होईल. म्हणजे तेच पोट दुखले तरी त्याची वैशिष्ट्ये वेगवेगळी पाहायला मिळू शकतात.

 

यातून सर्वातून तुमच्या लक्षत येईल कि औषधाच्या मात्रा बनविताना औषधातील ऊर्जेवर काम केले जाते, तसेच ही औषधे सिद्ध करताना त्यांच्या विविध मात्रांचा परिणाम हा त्या निरोगी व्यक्तीच्या संवेदनशीलता, प्रतिक्रियात्मकता आणि प्रतिकार शक्ती यावर दिसतो. म्हणजेच त्या व्यक्तीच्या ऊर्जेवर (energy level वर) दिसतो. आणि म्हणूनच आजारी व्यक्तीला देताना त्या व्यक्तीच्या उर्जेशी निगडीत मात्रा (Potency) निवडावी लागते. 

 

मुद्दा ३: Posology (आलेल्या रुग्णाला देण्याची औषध मात्रा ठरविणे)

 

आधी म्हणाल्या प्रमाणे मात्रा निवडताना रुग्णाच्या उर्जेचा विचार केला जातो. यात अनेक घटक लक्षात घेतले जातात. जसे की रुग्णाचे वय, त्याची प्रतीक्रीयात्मकता, प्रतिकार शक्ती, आजाराचे स्वरूप, त्याची पातळी, पूर्ण बरे होण्याची शक्यता, लक्षणाची भाषा, त्याचे पैलू, आजाराची अनुवंशिकता, निवड केलेल्या औषधाचे कार्यक्षेत्र इत्यादी. हे आणि इतर सर्व लक्षात घ्यायचे घटक ठरवण्या मागे सखोल शास्त्रीय अभ्यास आणि कारणे आहेत. होमिओपथिच्या सिद्धान्तांवर ती आधारलेली आहेत. ती सर्व इथे थोडक्यात मांडणे अवघड आहे.

 

पण महत्वाचा मुद्दा हा कि तुम्हाला दिलेल्या औषधाची मात्रा ठरवताना हा सर्व विचार केला जातो. विशिष्ठ रुग्णाला जसे विशिष्ठ औषधच लागू पडते त्याचप्रमाणे विशिष्ठ मात्राच लागू पडते.

आधुनिक औषध शास्त्रात साधारणतः अपेक्षित परिणाम, जशी मात्रा वाढत जाते तसा वाढत जातो. पण हे गणित होमिओपॅथी शास्त्रात लागू होत नाही.

एखाद्या औषधाच्या विशिष्ठ मात्रेने थोडे बरे वाटले कि बऱ्याच रुग्णांना असे वाटते कि याहून अधिक मात्रा असलेले औषध जर घेतले तर पटापट बरे होऊ. तर तसे नाही. होमिओपॅथी शास्त्रात अनेक सिद्धांत आणि नियम आहेत. त्यानुसार जर औषधाची निवड, मात्रेची निवड आणि मात्रा देण्याची पद्धत ठरवली गेली, तर योग्य गुण येतो.

 

डॉ. अश्विनी पटवर्धन.

M.D.(Hom)