“डॉक्टर, मला तुम्ही मागच्यावेळी जे औषध दिल होत तेच द्या, त्याने छान बरे वाटते.”
“डॉक्टर, मला परत तसा त्रास सुरु झाला म्हणून मला तुम्ही मागच्यावेळी जे औषध दिल होत ते औषध मी घेतल, पण मला अजूनही अजिबात बर वाटत नाहीये.”
सर्वात महत्वाचे म्हणजे, अॅलोपॅथीच्या औषधांना लागू होणाऱ्या संकल्पना होमिओपथिच्या औषधांना लागू होत नाहीत. कारण त्यांचा पाया म्हणजे आजाराची संकल्पना, औषधे बनवण्याची पद्धत, औषधे निवडणे व त्यांची मात्रा ठरवणे हे सर्व दोन्ही शास्त्रात निरनिराळे आहे.
खर तर अॅलोपॅथी असो वा होमिओपथि, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध परस्पर स्वतःच घेणे हे चूकच! पण मुख्यत्वेकरून अॅलोपॅथीच्या गोळ्या घेतल्यामुळे रुग्ण त्याचे आडाखे होमिओपथिला जोडतात. म्हणून हा मुद्दा स्पष्ट होणे गरजेचे आहे.
अॅलोपॅथीमध्ये; मुख्यत्वेकरून आजाराचे निदान व त्याची लक्षणे, त्याची pathology, pathophysiology यावर आधारित औषध निवडले जाते.
होमिओपथिमधे, व्यक्तीचा आजार, त्या मागची कारणे (मानसिक, पर्यावरण विषयक, अनुवांशिक किंवा जीवनशैलीशी निगडीत), रोगाचे निदान, त्याची pathology, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रकृतीनी त्या अजाराला दिलेली प्रतिक्रिया; या सर्व गोष्टी सामावणारे व त्यांना एकरूप होणारे औषध निवडले जाते. या मध्ये त्या व्यक्तीच्या प्रकृतीचा (मानसिक व शारीरिक) व आजाराचा दोन्हीचा विचार केला जातो.
उदाहरण द्यायचे झाले तर पाय दुखतोय म्हणून जर painkiller दिली असेल तर परत पाय दुखल्यावर तीच घेऊन बरे वाटू शकते. पण होमिओपथिचे औषध जे आधीच्या वेळी पायदुखी वर दिले होते ते परत लागू पडेलच असे नाही.
होमिओपथिमधील वरील औषध निवडण्याची पद्धत लक्षत घेता, जसे दोन व्यक्तींना एकाच आजारासाठी वेगवेगळी औषधे लागू शकतात तसेच एकाच व्यक्तीला त्याच आजारासाठी दोन वेगळ्या वेळांना दोन वेगळी औषधे लागू शकतात. त्या वेळच्या संपूर्ण लक्षणावर आधारीत आणि व्यक्तीच्या प्रकृतीसाठी योग्य असे औषध निवडावे लागते.
होमिओपथी मध्ये एखाद्या आजारावर अनेको औषधे असतात पण त्यातील आलेल्या रुग्णाला त्या क्षणी कोणते औषध लागू पडेल हे ठरवायला बर्याच घटकांचा विचार केला जातो. जसे कि आजाराला कोणत्या गोष्टी मुळे सुरुवात झाली, लक्षणे कश्याने वाढतात व कमी होतात, आजाराच्या लक्षणांबरोबर इतर काही लक्षणे आहेत का, काही विशिष्ट कारण आहे का (मानसिक, पर्यावरण विषयक, अनुवांशिक किंवा जीवनशैलीशी निगडीत), प्रकृतीतील दोष काय आहेत, तसेच खाण्यातील आवडी निवडी, त्या रुग्णाची नैसर्गिक घटकांशी असलेली संवेदनशीलता, तसेच भूक, तहान, झोप, उत्सर्जने (घाम, लघवी, मल), महिलांमध्ये मासिक पाळीची लक्षणे आणि त्या व्यक्तीचा स्वभाव व व्यक्तीमत्व इत्यादी.
आता या घटकांमध्ये सुद्धा त्यावेळी त्या रुग्णात कोणत्या घटकाला प्राधान्य द्यायचे हे आजारावर, त्याच्या स्थितीवर, pathology वर, आणि औषधाचे ध्येय काय आहे यावर अवलंबून असते.
उदाहरणार्थ. एक काकू माझ्याकडे सर्दी खोकल्याचे औषध घेण्यासाठी आल्या त्यांना त्यावेळच्या औषधाने उत्तम गुण आला. त्यानंतर त्यांनी माझ्याकडे त्यांच्या इतर जुनाट आजारासाठी औषध घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना परत एकदा सर्दी खोकला झाला होता. व त्यांनी न विचारता स्वतःच आधी दिलेले औषध घेऊन टाकले. त्यांना जाणवणारी लक्षणे ही त्यांच्या मते पूर्वी सारखीच होती. पण माझ्या नजरेतून पाहता आत्ताची लक्षणे पूर्णपणे भिन्न होती. दोन दिवसातच त्या माझ्याकडे आल्या. आत्ताच्या लक्षणानुसार आत्ताचे वेगळे औषध निवडून मी त्यांना दिले व त्यांना उत्तम गुण आला. तात्पर्य असे कि औषध ज्या ज्या पायांवर निवडले जाते ते सर्व समावेशक नजरेतून पाहण्याची गरज असते आणि ते फक्त रुग्णाला जाणवणाऱ्या लक्षणावर किंबहुना रुग्णाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या लक्षणावर अवलंबून नसते.
कधी कधी असेही होऊ शकते कि कदाचित औषध तेच निघते पण त्याची मात्रा वेगळी लागते. आणि क्वचित मात्रेसकट तेच औषधही लागू पडू शकते. पण हे सर्व आधारीत असते ते त्या व्यक्तीच्या त्यावेळच्या प्रकृतीच्या स्थितीवर आणि त्या वेळच्या सर्व (प्राकृतिक आणि आजाराच्या) लक्षणावर. तर लक्षात काय ठेवाल?
१. डॉक्टरांना आधीचेच औषध परत देण्यासाठी आग्रह करू नका.
२. औषधे परस्पर स्वतःच घेऊ नका.
३. अगदीच डॉक्टर कडे जाणे जमत नसेल तर औषध घेण्याआधी डॉक्टराना एकदा फोनवर विचारा.
४. आणि तेपण जमले नाही तर गुण न येण्याची मनाची तयारी ठेवा.
५. आणि जरी बरे वाटले तरी ते सल्ल्याशिवाय सतत अजिबात चालू ठेऊ नका.