POLY CYSTIC OVARIAN SYNDROME AWARENESS MONTH SEPTEMBER 2021



पहिली मैत्रीण “अग तू येणार आहेस ना आपल्या शाळेच्या get-together ला?”

 

दुसरी मैत्रीण “नाही ग, मला खूपच awkward वाटतंय.”

 

पहिली मैत्रीण “का ग? ये की, खूप दिवसांनी चांगल्या गप्पा मारू, मजा करू, beach च location आहे मस्त.”

 

दुसरी मैत्रीण “नाही ग, तेच, periods कधी येतील याचा नेम नसतो. Beach वगरे जमणारच नाही अचानक आले तर! त्यातून वजन, स्थूलपणा. कशी येऊ मी अशी. उगाच चर्चेचा विषय सर्वांना. आणि बाकी issue बद्दल लोक विचारतात ते निराळच. मग सगळ्यांचे सल्ले. मग माझापण मूड जाणार आणि चिडचिड होईल ते वेगळच. नकोच ते! या PCOD च काय करायचं कळत नाही.”

 

हा असा संवाद, संकोच पूर्वी जरा कमी ऐकू येत असेल कदाचित. पण आता जवळ जवळ पाच महिलांपैकी एक महिला ही वाक्ये बोलत असेल. कारण PCOD किंवा PCOS (Poly Cystic Ovarian Disease/Syndrome) आता जवळ जवळ पाच पैकी एका महिलेत पाहायला मिळते.

 

थोडक्यात जाणून घेऊ कि काय असतो हा PCOS चा आजार.

 

सामान्यतः दर महिन्यात एक बीज (ovum) हे बीजांडातून (ovary) परिपक्व होऊन त्यातून बाहेर पडते. त्यालाच ovulation अस म्हणतात. त्यानंतर ते फलित झाले नाही तर पाळी येते. आणि नंतर परत पुढील बीज तयार होण्याचे चक्र चालू राहते. ही सर्व क्रिया संप्रेरकांच्या (Hormones) संदेशान्द्वारे होत असते. पण काही कारणांमुळे या संप्रेरकांचे प्रमाण कमी जास्ती होते. आणि त्यामुळे बीज बाहेर पडण्याची क्रिया म्हणजेच ovulation घडत नाही. ज्यामुळे अनेक तयार बीजे अंडाशयात साचून राहतात. आणि त्यामुळे अंडाशयावर पाण्यानी भरलेले अनेक फोड निर्माण झाल्यासारखे अंडाशय दिसते. यालाच polycystic ovary असे म्हणतात.

 

यात पाळी अनियमित होते किंवा पाळीच्यावेळी रक्तस्त्राव खूप कमी वा खूप जास्त होतो. तसेच संप्रेरकांचेप्रमाण कमी जास्त झाल्याने इतर शारीरिक लक्षणे सुद्धा निर्माण होतात, जसे कि हनुवटीवर ओठांच्यावर केस वाढतात, डोक्यावरील केस गळतात, वजन वाढते, मुरूमे येतात. त्याचप्रमाणे मानसिक पातळीवरही याचा परिणाम दिसतो. अचानक मूड बदलातो, उदासीन वाटते, शारीरिक संबंध ठेवायची भावना कमी होते, चिडचिड होते. आणि महत्वाचा परिणाम म्हणजे वंध्यत्व.

 

यामागे अनेक कारणे दिसून येतात. पण अनुवांशिकता आणि चुकीची जीवनशैली ही दोन महत्वाची कारणे. अनुवांशिकता, ज्यात जास्त करून रक्ताच्या नात्यात मधुमेह, रक्तदाब, थयरोइडचे आजार असतात. आणि चुकीची जीवनशैली ज्यात व्यायामाची कमतरता, प्रक्रिया केलेल्या किंवा preservatives असलेल्या अन्नपदार्थांचे सेवन आणि मानसिक ताण तणाव यांचा समावेश होतो. नवीन संशोधना नुसार इन्सुलिनची अकार्यक्षमता हे सुद्धा यामागचे महत्वाचे कारण आहे, ज्यामुळे हळुहळू अंडाशये जड (bulky ovaries) होतात आणि चुकीच्या प्रमाणात संप्रेरके (hormonal imbalance) निर्माण करतात.

 

पाळीची अनियमितता, अंडाशायातील बदल आणि इतर वर नमूद केलेली लक्षणे जी संप्रेरकांचे प्रमाण बदलल्याने निर्माण होतात; यापैकी जर दोन गोष्टी दिसून आल्या तर PCOS चे निदान होते. सोनोग्राफी केल्याने अंडाशयातील बदल दिसून येतात. पण काहीवेळा अंडाशयात बदल दिसत नसले तरीही PCOS असू शकते. मग संप्रेरकांचे प्रमाण (hormonal study) तपासले जाते. ज्यात PCOSचे पूर्ण निदान होऊ शकते.

 

पाळी आल्यानंतर ते पाळी जाईपर्यंत कोणत्याही वयात हा आजार होऊ शकतो. पण साधारणतः जेव्हा विवाहित स्त्री बाळाचा विचार करत असते आणि मुल होत नसते तेव्हा, किंवा अविवाहित मुलींमध्ये खूप वजन वाढले असेल किंवा पाळी अनियमित असेल तेव्हा, डॉक्टरकडे तपासणी केल्यावर लक्षात येते कि PCOS आहे. नाहीतर खूप गंभीर लक्षणे नसल्याने स्त्रिया याकडे दुर्लक्ष करतात आणि आजार असल्याचे लवकर कळत नाही. कित्येक महिलांमध्ये फक्त खूप केस गळणे एवढेच लक्षणसुद्धा दिसून येते. आणि मग अजून माहिती विचारल्यावर अनियमित पाळी बद्दल कळते आणि तपासण्या केल्यावर PCOS बद्दल कळते. गंभीर लक्षणे वर वर पाहता जरी वाटली नाहीत तरी जास्त काळ PCOS असल्यास अश्या महिलांना पुढील वयात मधुमेह, उच्च रक्तदाब आणि गर्भाशयाचा किंवा अंडाशयाचा कर्करोग होण्याचा धोका निर्माण होतो.

 

माझी त्या सर्व महिलांना विनंती आहे कि तुमचे त्रास लपवू नका. पाळी अनियमित असेल किंवा खूप कमी किवा खूप जास्त रक्तस्त्राव होत असेल, कारणाशिवाय वजन वाढत असेल, खूप केस गळत असतील, अयोग्य जागी केस येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्या. गरज असल्यास तपासण्या करा.

 

अजून एक महत्वाचा भाग म्हणजे या आजाराबरोबर निर्माण होणारी कमीपणाची भावना. भारतातील सामाजिक पार्श्वभूमीमुळे, जास्त करून PCOS मुळे वंध्यत्वाला तोंड देणाऱ्या महिलांमध्ये आणि जाडेपणा असलेल्या महिलांमध्ये हे आढळते. PCOSआजाराचा परिणाम म्हणून आणि त्याबरोबरच सामाजिक ताणामुळे, कमीपणा, न्यूनगंड, काळजी, अतिविचार, चिडचिड आणि नैराश्य, अश्या विविध भावनिक ताणातून ती महिला जात असते. घरचे किंवा इतर लोकही समजून घेणारे असतील तर चांगले पण काही वेळा याही बाबी मानसिक ताण वाढवतात. आणि ते एक दुष्ट चक्र होते. हे शास्त्रज्ञांनी पण सिद्ध केले आहे कि मानसिक ताणाचा परिणाम संप्रेरकांच्या प्रमाणावर होतो. आणि म्हणूनच सामाजिक स्तरावरही अश्या स्त्रियांना समजून घेणे गरजेचे आहे. जसा सर्दी खोकला ताप आला तर आपण त्या व्यक्तीला दोष देत नाही. तसच हाही एक आजार आहे आणि यात त्या स्त्रीला दोष देणे, टोचून बोलणे हे अत्यंत चुकीचे आहे. असे करू नयेच पण असे घडताना आढळल्यास त्याला विरोध करावा. लोकांचे प्रबोबन करावे.

 

यावर जर hormonesच्या गोळ्या घेतल्या तर पाळी नियमित येते. पण यामुळे एक तर hormones चा balance तातपुरताच होतो. त्याशिवाय हा कायमस्वरूपी उपाय असू शकत नाही. त्याचे इतर दुष्परिणाम होतात ते वेगळे.

 

होमिओपँथी मध्ये पूर्ण माहिती घेऊन त्यानुसार विशिष्ठ औषध काढून आजार आतून बरा केला जातो. ज्यामुळे संप्रेरकांचे प्रमाण हळू हळू व्यवस्थित होऊन पाळी नियमित होते आणि गर्भधारणेची शक्यता वाढते. पण औषधाबरोबरच जीवनशैलीतील बदल, नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहार हे बदल करणेही तेवढेच महत्वाचे असते.

 

©डॉ. अश्विनी पटवर्धन. पुणे.

MD (Homoeopathy)

Mob 7506079801

www.restorevitality.in

www.drashwinihomoeopathy.com